News – सुशीलनं जिंकलं ‘सिल्व्हर’, भारताच्या पदकांचं ‘सिक्सर’!

0
1008

NEWS :- लंडन ऑलिंपिकमध्ये ६६ किलो वजनी गटाच्या फ्री स्टाइल कुस्तीत रविवारी झालेल्या अंतिम फेरीत भारताचा पहिलवान सुशीलकुमार यानं रौप्य पदक पटकावलं. अंतिम फेरीत जपानचा मल्ल तात्शिरो योनेमित्सुने सुशीलकुमारचा पराभव करुन सुवर्णपदक पटकावलं. बिजिंग ऑलिम्पिकमध्ये ब्रॉंझपदक विजेता सुशील दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदकांची सलग कमाई करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

Sushil Kumar
Sushil Kumar

अंतिम फेरीच्या पहिल्या राउंडमध्ये सुशील गुण करू शकला नाही. दुस-या राउंडमध्ये मात्र जपानच्या पहिलवानाने एकदम मुसंडी घेत तीन गुण कमावले. सुशीलचे काही डाव चुकीचे पडले. फेरीच्या सुरुवातीला सुशील किंचितसा दबावातही दिसत होता. कुश्तीमध्ये रौप्य पदक जिंकल्याचं वृत्त कळताच सुशीलच्या हरियाणातील गावात आणि देशभरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.

बक्षिसांची खैरात

सुशीलकुमारने रौप्य पदक जिंकताच त्याच्यावर चोहीकडून बक्षिसांची खैरात सुरु झाली आहे. हरियाणा सरकारने त्याला दीड कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले असून दिल्ली सरकार एक कोटी रुपये देणार आहे. शिवाय केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाकडून त्याला ५० लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. दिल्ली सरकारने त्याला भूखंड देण्याचे जाहीर केले आहे.

सुवर्ण हुकल्याची हुरहुर मात्र रेकॉर्डचा अभिमान!

रविवारी अंतिम सामना सुरु होण्यापूर्वी सुशीलकुमारला वांत्या झाल्याचं वृत्त आहे. यामुळे त्याच्या कामगिरीवर थोडा परिणाम झाला असावा. सुशीलकुमारचे वडील दीवाण सिंह यांना आपल्या मुलाचे सुवर्णपदक थोडक्यात हुकल्याची हुरहुर असली तरी देशाला ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवून दिल्याबद्दल अभिमान वाटतो. सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदक मिळविणं सोप्पं काम नसल्याचं ते म्हणाले.

देशांतर्गत स्पर्धांमध्ये सुशीलकुमारला तगडा प्रतिस्पर्धी न मिळाल्यामुळं त्याचा नीट सराव झाला नसावा आणि ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक हुकण्यामागे हे एक कारण असावं , अशी शक्यता सुशीलकुमारच्या वडीलांनी बोलून दाखवली. अंतिम सामन्यात सुशीलचा पराभव करणा-या जपानी मल्ल एकूण सात सामने खेळला होता तर सुशीलकुमार हा नऊ सामने खेळला होता. परिणामी त्याच्यात थकवा आला असावा असंही ते म्हणाले.

सुशीलकुमारने जिंकलेले पदक हे देश आणि कुस्तीच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचे असून भारतीय मल्लांच्या मनात परदेशी मल्लांची असलेली धास्ती यामुळे निघून गेली असल्याचं भारतीय कुस्ती महासंघाचे सरचिटणीस राजसिंह यांनी लंडनहून बोलताना सांगितलं. परदेशी मल्लांच्या मनात आता सुशीलकुमारचे भय आणखी वाढणार असून देशात कुस्तीचा विकास होणार असल्याचेही ते म्हणाले.

आजचा सामना सुरु होण्यापूर्वी एक योजना तयार करण्यात आली होती. त्यानुसार सुशीलला सतत आक्रमक राहण्यास सांगण्यात आले होते. या धोरणाची मदत झाली. सुशीलकुमार सुवर्णपदक जिंकू शकला नसला तरी यामुळे एक इतिहास नक्कीच रचला गेला , असं राजसिंह यांनी सांगितलं.

(Source: Maharashtra Times.com – http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/15461569.cms)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here